ब्लॉगर्स आणि त्यांचे मला आवडलेले ब्लॉग

त्याकाळी, म्हणजे २००५/२००६ साली मराठी ब्लॉगविश्व फारच छोटं होतं. (कदाचित त्यामुळेच ?) खूप छान होतं. सगळे एकमेकांना ओळखायचे. ब्लॉग आवडले तर सांगायचे, नाही आवडले तर ते ही सांगायचे, कोणी थोडे दिवस नाही लिहिलं तर लगेच मेल, कमेंट्स मधून चौकश्या व्हायच्या. तेव्हा आज आहे तितका युनीकोडचा सर्रास वापर सगळ्या ठिकाणी होत नव्हता. ब्लॉग असला तरी त्यावर टाईप करायला बरहा वापरायला लागायचं. मला मराठी ब्लॉगविश्वाचा शोध अचानकच लागला होता. "मासा आणि मासोळी" हे मी तेव्हा वाचलेलं मराठी ब्लॉगवरच पहिलं पोस्ट. नंतर मी रेग्युलरली ब्लॉग्ज वाचायला लागलो. काही काही ब्लॉग्ज अगदी खूप लक्षात राहिले. नंतर ते परत परत वाचले गेले.

मधे एकदा बोलता बोलता विषय निघाला तेव्हा परत काही ब्लॉग पोस्ट शोधून काढले आणि वाचले. पुढच्यावेळी एकेठिकाणी सापडावे म्हणून लिंक्स एकत्र टाकतोय.

१. मराठी ब्लॉगविश्वातला माझा सगळ्यात आवडता ब्लॉग म्हणजे ट्युलिपचा ब्लॉग. ह्यातले बरेच पोस्ट्स माझे अक्षरशः शेकडो वेळा वाचून पाठ झाले आहेत ! त्यातल्या माझ्या आवडत्या काही पोस्टच्या लिंक्स.

- जोशी आणि जोशीण : http://tulipsintwilight.blogspot.com/2006/09/blog-post_12.html
- मुंबईतला पाऊस : http://tulipsintwilight.blogspot.com/2006/07/blog-post.html
- चारुलता, स्वारोव्स्की आणि सरत्या उन्हाळ्यातली एक संध्याकाळ.. : http://tulipsintwilight.blogspot.com/2007/10/blog-post.html
- पांथविराम उचलण्यापूर्वी : http://tulipsintw
ilight.blogspot.com/2007/05/blog-post.html
- सुंदरबन : Sundarban: http://tulipsintwilight.blogspot.com/2007/04/blog-post.html

२. मी वर म्हंटलं तसं मी वाचलेलं पहिलं पोस्ट (पामरच्या ब्लॉग वरचं) : मासा आणि मासोळी : http://paamar.blogspot.com/2005/09/blog-post.html

३. नंदनच्या 'मराठी साहित्य' ब्लॉगवरचे बरेचसे पोस्ट खूप वाचनीय आहेत. त्यातला सखाराम गटणेवरचा पोस्ट खूप लक्षात राहिला. नंतर तो इमेलवरुनही बराच फिरला होता.
http://marathisahitya.blogspot.com/2007/05/blog-post.html

४. संवेदचा पूर्ण ब्लॉगच खूप सही असतो. अगदी ब्लॉगच्या नावला शोभेल असा !
http://samvedg.blogspot.com/

५. त्या काळी अभिजीत बाठे हा ब्लॉगर खूप अ‍ॅक्टीव असायचा. हल्ली फारसं लिहित नाही बहूतेक तो.
त्याचा 'एक डाव भुताचा' (आयटमच भुत) हा पोस्टपण खूप आवडला होता.
http://abhijitbathe.blogspot.com/2007/03/blog-post.html.

६. गायत्रीचं 'समईच्या शुभ्र कळ्या' गाण्याचं रहग्रहण फार सुंदर आहे. सारेगमप मध्ये जेव्हा जेव्हा हे गाणं सादर झालं तेव्हा मी हे पोस्ट काढून वाचलय. http://bolaacheekadhee.blogspot.com/2006/12/blog-post.html

७. केतन कुलकर्णीचा ब्लॉग पण मला फार आवडायचा. त्याचं लिखाणं खूप ड्रिमी असायचं.
त्यातलं हे एक पोस्ट आणि VOF चं प्रवासवर्णन आवडलं होतं. http://asach-aapla.blogspot.com/2008/08/post-50.html

८. संवादिनीचा ब्लॉग एकदम हलकाफुलका असायचा. त्यातली काही पोस्ट वाचून 'अगदी अगदी' असं म्हणावसं वाटायचं. त्यातले काही लक्षात राहिलेले पोस्ट.
जग्गू : http://samvaadini.blogspot.com/2008/01/blog-post.html
दिल्ली आणि नेलपॉलीश : http://samvaadini.blogspot.com/2008/06/blog-post_19.html
लग्न : http://samvaadini.blogspot.com/2009/01/blog-post_29.html ह्यातलं 'नविन सूनबाईंच विविध गूणदर्शन' वाचून फार हसलो होतो !!

९. विद्या भूतकरचा ब्लॉगही मी फॉलो करायचो. साधा सिंपल छान असायचा. http://vidyabhutkar.blogspot.com/

१०. अभिजीत कुलकर्णीचा ब्लॉगपण सही असायचा. पण त्याने तो आता डिलीट केला की काय माहित नाही. आता सापडत नाहिये. :|

पुढे ब्लॉगविश्वाशी संपर्क थोडा कमी झाला. आता परत ब्लॉग्ज वाचणं सुरु करायचं आहे. सध्याच्या "पिढीतल्या" आपल्या आवडत्या ब्लॉग्जच्या लिंक कोणी इथे टाकल्यास माझी काही हरकत नाही.

स्त्रीमुक्तीच्या माझ्या कल्पना...

सध्या मायबोली संकेतस्थळावर महिला दिनाच्या शतकमोहोत्सवानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम सुरु आहेत. मुख्य म्हणजे हे कार्यक्रम महिलांपुरते मर्यादित न ठेवता सगळ्यांसाठी खुले ठेवले आहेत. ह्यापैकी एका कार्यक्रमात संयोजकांनी सगळ्यांना 'स्त्रीमुक्तीच्या माझ्या कल्पना' ह्या विषयावर आपले मनोगत मांडण्याचं आवाहन केलं होतं.
तर मी लिहिलेला परिच्छेद खाली देत आहे....
--------------------------------------------------------------------------------
ह्या विषयावर लिहायला बसल्यावर स्त्रीमुक्ती, स्त्री-पुरुष समानता वगैरे विषयांबद्दल सर्वप्रथम कधी विचार केला होता हे आठवायचा प्रयत्न करत होतो.
वैयक्तिक पातळीवर बघायला गेलं तर आमच्या घरातल्या सर्वच स्त्रिया फार कर्तबगार आहेत. आज्जीने नाशिक सारख्या ठिकाणी साधारण १९३० च्या आसपास वयाच्या आठ-दहाव्या वर्षी पोहोण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन आणि बक्षिसे मिळवून क्रांती घडवली होती. नंतरही आजोबांच्या आजारपणामुळे एकटीने निर्णय घेऊन, पैशांची सोय करून ७० च्या दशकात पुण्यात जमीन घेतली. घरातले सगळे व्यवहार वगैरे तिच बघत असे. माझी आई आमच्या कुटूंबातली पहिली डबल ग्रॅज्युएट सून म्हणून आज्जीला तिचे फार कौतुक. आईनेही २२ वर्ष नोकरी करून बाबांच्या बरोबरीने किंवा थोडेफार जास्तच सगळे व्यवहार संभाळणे, महत्त्वाचे निर्णय घेणे वगैरे सगळं केलं. पुढे वहीनी आणि माझी बायको ह्या मार्कांनुसार, मिळवलेली बक्षिसे, sincerity वगैरेंनुसार आमच्यापेक्षा जास्त हुषार आहेत असं कौतुक माझी आई करत असते आणि त्या दोघींचाही घरातल्या सगळ्या गोष्टींमध्ये अर्थातच पूर्ण सहभाग असतो. त्यामुळे घरातल्या स्त्रियांकडे बघता त्यांना कधी 'मुक्ती' वगैरेची गरज आहे असं वाटलच नाही (hopefully !) आणि आजुबाजूचं जग बघेपर्यंत ह्याची कधी जाणिवच झाली नाही. घरातल्या स्त्रियांना कधी त्रास झाला नसेल असं नाही (म्हणजे घरी लवकर ये, परिक्षा आहे तर बाहेर नको जाऊ, घरात आजारपण आहे तर दांडी मार वगैरे हे फक्त आईला किंवा आज्जीलाच सांगितलं गेलं, बाबांना नाही) पण त्या स्त्रिया आहेत म्हणून तो झाला ह्यापेक्षा हक्काच्या भावनेतून तो झाला असावा असं मला वाटतं.

नंतर खटकलेली अगदी जवळची तीन उदाहरणं आठवली. एकामध्ये सासरच्या अतिधार्मिक वातावरणामुळे मुळात तसा स्वभाव नसतानाही आयुष्यभर करावी लागणारी तडजोड होती. दुसर्‍यामध्ये दोन्ही मुली झाल्या म्हणून आयुष्यभर सासूने टोमणे मारणे, कुजकट बोलणे हे प्रकार होते. तर तिसर्‍यामध्ये सुनेने साडीच नेसली पाहिजे, असच वागलं पाहिजे, तसच केलं पाहिजे वगैरे गोष्टी होत्या. ह्या तीनही उदाहरणांचा विचार करताना वाटलं की मला ह्यांच्या परिस्थितीबद्दल वाईट वाटतय. पण त्यांना तसं वाटतय का ? त्यांना आपल्यावर अन्याय होतो आहे ह्याची जाणीव आहे का? पाहिल्या दोन्ही उदाहरणांमधल्या स्त्रिया ह्या अत्ताच्या काळातल्या, भरपूर शिकलेल्या, उत्तम नोकरी करणार्‍या अश्या आहेत. पण जर सासरी असणार्‍या इतर काही चांगल्या गोष्टींमुळे अन्यायाची जाणीव असूनही त्यांना हा अन्याय दुय्यम वाटत असेल आणि त्यांची तडजोडीची तयारी असेल तर 'मुक्ती' मुळात हवी का?
हा सगळा विचार करायला लागल्यावर स्त्रीमुक्ती म्हणजे नक्की काय ह्याबद्दलच डोक्यात गोंधळ झाला !
स्त्रियांची मुक्ती नक्की कोणापासून करायची ? पुरुषांपासून, इतर स्त्रियांपासून, संपूर्ण समाजापासून की अजून कश्यापासून ? म्हंटलं तर ह्या सगळ्यांपासूनच, म्हंटलं तर कश्यापासूनच नाही.

स्त्रीमुक्ती झाली असं नक्की कधी म्हणायचं ?
- अन्याय होत असेल तर अन्याय होतो आहे ह्याची जाणीव होण्याइतपत जागरुकता समाजातल्या सर्व स्तरातल्या स्त्रियांमध्ये आलेली असेल. जेणेकरून होण्यार्‍या अन्यायाचा तिथल्या तिथे बंदोबस्त केला जाईल आणि कुठलीच जाचक गोष्ट परंपरा म्हणून सुरु होणार नाही.
- नैसर्गिक वेगळेपण वगळता बाकी कोणतीही लेबलं न लावता स्त्रीला सर्वसाधारण माणूस म्हणून वागवलं जाईल. स्त्री आहे म्हणून अन्याय होणार नाही किंवा स्त्री आहे म्हणून वेगळे मानसन्मान मिळणार नाहीत.
तसच ज्या कारणासाठी स्त्री आणि पुरूष ही नैसर्गिक रचना आहे ते कारण वगळता इतर गोष्टीत एखादी व्यक्ती स्त्री आहे की पुरुष ह्यांने फरक पडणार नाही.
- स्त्रियांच्या स्त्रीत्त्वाचा वैयक्तिक स्वार्थासाठी इतरांकडून वापर केला जाणार नाही (शारीरीक/मानसिक त्रास देणे, स्त्री आहे म्हणून संधी नाकारणे, पगार कमी देणे इत्यादी) किंवा स्त्री स्वत:ही तसा वापर करणार नाही ('कॉर्पोरेट' पिक्चरमध्ये बिपाशा बासू जे करते त्यासारखं काही, घरातल्या जबाबदार्‍यांची खोटी कारणे सांगून काम टाळणे, emotional blackmailing सारखे प्रकार इत्यादी ).
- मुलगी झाली म्हणून घरात दु:ख होणार नाही किंवा उलट टोक म्हणजे मुलगी व्हावी म्हणून नवस केले जाणार नाहीत.
- समाजातले पुरुष आणि स्त्रियांमधले प्रमाण निसर्गाद्वारे ठरवले जाईल, त्यात माणसाची ढवळाढवळ असणार नाही.
- संयुक्ता सारखे वेगळे गट स्थापन करायची, स्त्री मुक्ती वर लिखाण करायची, त्यासाठी आंदोलने करायची गरज पडणार नाही.

हे साध्य होणं ही एका दिवसातली गोष्ट नक्कीच नाही. कायदेशीर मार्गाने जे काय करता येईल ते वेगवेगळ्या संस्था करतच आहेत. पण मुळात mentality बदलण्याची गरज आहे आणि ती करण्यासाठी जे शक्य होईल प्रयत्न प्रत्येकाने केले पाहिजे. समाजप्रबोधन आणि घरातले संस्कार ह्या सगळ्यातल्या मोठा आणि महत्त्वाचा घटक आहे आणि थोडेफार सकारात्मक बदल हे येणार्‍या पिढ्यांमध्ये दिसतच आहेत. मुलांच्या समोर "पोरीचं/बायकांचं असच असतं.. त्यांना काही झेपत नाही.. त्यांच्याशी कसही वागलं तरी काय फरक पडतो" वगैरे वाक्य किंवा मुलींना "मुलीच्या जातीला हे असलं शोभत नाही.." वगैरे फंडे देणं लहानपणापासूनच टाळलं पाहिजे आणि समाजातल्या प्रत्येकाचाच व्यक्ती म्हणून आदर करण्याची शिकवण दिली पाहिजे.

वीस वर्षापूर्वी घरातल्या भांडीवाल्या बाईचे जे प्रश्न होते तेच आजही आहेत ! आणि हे बदलणं शिक्षण समाजातल्या तळागाळात पोचलं तरच शक्य होऊ शकेल. वैयक्तिक पातळीवर आपण जे शिकतो, आचरतो ते अगदी प्रत्येकाने, प्रसंगी इतरांचा विरोध पत्करून, थोडाफार धोकाही पत्करून सार्वजनिक जिवनातही आचरणात आणले तर परिस्थितीत नक्कीच लवकर फरक पडेल.